मेघडंबरी :
आपणा सर्वांच्या गुरू भक्तीचे, भावाचे प्रतिक, श्री महाराजांचे सगुण रूप, पादुका व विठ्ठल
रखुमाई यांच्या मूर्तीवर मेघडंबरी झाली. यामुळे महाराजांच्यापुढे नतमस्तक होत असता मनीचा भाव आणखीन
वाढतो. हे श्री महाराजांनी आम्हा साधकांवर धरलेले कृपाछत्र आहे.
पंढरपूर :
२५ डिसेंबर १९१० या दिवशी श्री महाराज पांडुरंगाचे चरणी आपण केलेला नवस फेडण्यास
पंढरपूरास गेले. त्यास १०० वर्षे झाल्याने ता. २५ डिसेंबर २०१० रोजी त्यांच्याच कृपेने, साधक मंडळींनी मोठया
संख्येने पंढरपूरात एक दिवसाचा नेमाचा, भजनांचा प्रवचनांचा थाट केला व महाराजांच्या भक्तिचे ऋण अंशतः
फेडले. हा भक्तीचा सोहळा अत्यंत भावपूर्ण झाला.
मारूती मंदिर, उमदी :
उमदी क्षेत्रात मारूतीचे पुरातन मंदिर आहे. हे जागृत स्थान आहे. याच मंदिरात श्री साधुबुवांचे १२ वर्षे वास्तव्य
होते.त्यांनी कट्टाची नाम साधना येथेची केली. श्री महाराज नित्य मारूतीच्या दर्शनासाठी व पुजेसाठी येथे येत असत.
त्यावेळी श्री रघुनाथ प्रिय साधुबुवांनी त्यांचे लक्ष सगुणाकडून निर्गुणाकडे वळविले व श्री निंबर्गी महाराजांचेकडून
अनुग्रह देवविला.
निर्याण शताब्दी महोत्सव : श्री महाराजांच्या निर्याणाला २५ जानेवारी २०१४ रोजी शंभर वर्षे पूर्ण झाली. या प्रसंगी तीन दिवसाचा
अतिशयभव्य सोहळा सद्गुरू कृपेने पार पडला. सप्ताहात साधकांनी मोठया संख्येने भाग घेतला. समारंभासाठी
भव्य शामियाना उभारण्यात आला होता. कार्यक्रमास उदंड प्रतिसाद लाभला. साधकांनी भरभरून अर्थसहाय्य
केल्यानेच खालील कामांची पूर्तता झाली :जेवण घर व स्वयंपाकघर
ध्यान मंदिराचा विस्तार
यामुळे साधकांची उत्तम सोय करता आली. याचवेळी निर्याण शताब्दी निमित्त स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले.
अनेक मान्यवरांची प्रवचने झाली. आनंद, आनंद झाला. तो सांगता येत नाही.
श्री महाराजांच्या फोटोच्या कॅलेंडरचे प्रकाशन :
श्री महाराजांचे उपलब्ध असलेले फोटो, तसेच त्यांच्याशी जोडलेल्या प्रसंगाचे, वास्तुचे, फोटो एकत्रित
करून, नित्य स्मरण देणारे, भाव वाढविणारे, टेबल कॅलेंडर प्रकाशित केले. यावर फक्त तारखा असल्याने या
कॅलेंडरचा उपयोग वर्षानुवर्षे करता येईल. फोटोच्या बाजूस श्री महाराजांचे वचन छापल्याने दिवसभर चिंतनास ते
उपयुक्त आहे. यामुळे ते परमार्थाची सतत जाणीव देत राहते.
भजनामृत :
रोज मठात म्हणत असलेल्या भजनांचे पुस्तक तेथे येणार्या भाविकांसाठी उपलब्ध नव्हते. बर्याच लोकांना
त्याची जरूरी होती. रोजच्या भजनातील पुष्कळ अभंगाचा पूर्ण पारमार्थिक अर्थ समजत नाही. त्यामुळे म्हणत
असताना भाव उत्पन्न होत नव्हता हे लक्षात ठेवून नव्या छापल्या जाणार्या भजनामृत या पुस्तकात होईल तेवढया
अभंगांचा साधकांना उपयुक्त असा अर्थ देण्यात आला आहे. आतापर्यंत असे कोठेच करण्यात आले नव्हते. त्यामुळे
साधकांना हे जास्त उपयुक्त होणार आहे. याचे प्रकाशन दि-२९/१/२०१५ उमदी येथील मठात करण्यात आले. याची
उपयुक्तता जरूर पडताळून पहावी ही विनंती.
चिता भस्माची व रक्षेची स्थापना:
श्री महाराजांच्या पादुकांची व विठ्ठल रखुमाईच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा स्थापना श्री गुरूदेवांच्या
इच्छेनुसार सोमवार ता. १४/१०/१९५७, अश्विन वद्य पंचमीस श्री महाराजांच्या नेमाच्या जागेत करण्यात आली होती.
इंचगेरी येथे जशी श्री महाराजांच्या चिता भस्माची व रक्षेची स्थापना करून त्यावर समाधी करण्यात आली, तसेच या
रूपातही श्री महाराज उमदी येथे स्थित व्हावेत, ही सर्व साधकांची मनीची उत्कट इच्छा श्री महाराजांनी पुरविली.
निंबाळ येथे श्री गुरूदेवांनी जपून ठेवलेले श्री महाराजांचे चिताभस्म व रक्षा, यांचे नातू श्री दीपक आपटे यांनी आनंदाने
देऊ केले. त्याप्रमाणे २९ जानेवारी २०१५ ला साजरा झालेल्या पुण्यतिथीच्या सप्त्यामध्ये ज्येष्ठ व श्रेष्ठ साधक श्री भाऊ
जेऊरकर यांच्या शुभ हस्ते, सर्व साधकांच्या उपस्थितीत व जयजयकाराच्या घोषात, त्यांची स्थापना श्री महाराजांच्या
फोटो पुढे मेघडंबरीमध्ये करण्यात आली. श्री महाराजांनी सर्व साधकांचे मनोगत पूर्ण केले. श्री महाराजांनी साधकांचे
मनोगत पूर्ण केले. श्री महाराजांचा जयजयकार असो.
चांदीचे कडे :
श्री महाराजांनी, सप्त्याची नीट व्यवस्था व्हावी म्हणून ११ स्वयंसेवकांचे एक, अशी ३ पथके तयार केली होती. हे
स्वयंसेवक सर्व कार्यक्रमात उत्साहाने भाग घेत. यांना श्री महाराजांनी स्व खर्चाने प्रत्येकास दंडात बांधण्यास एक एक
चांदीचे कडे करून दिले होते. स्वंयसेवक ते आपल्या दंडावर बांधीत असत. तसेच प्रत्येकास एक विजार, शर्ट व टोपी
दिली होती. त्यावर बांधण्यास एक रूमालही दिला जाई. त्यातील एक स्वंयसेवक श्री कन्नुर मास्तर यांच्या हातातील
कडे आपण पाहत आहात. श्री महाराजांची दृष्टी पडलेली अशी ही अती पवित्र वस्तू आहे. आपल्याला ती पहायला
मिळते हेच आमचे परम भाग्य !